नेपाळमध्ये गेलेल्या डोंबिवलीतील दोघांशी संपर्क
ठाणे : नेपाळ येथील पूरग्रस्त भागात भारतातील बेपत्ता पर्यटकांपैकी १२ जण ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवली येथील असून त्यापैकी डोंबिवलीतील दोन जणांचा आज संपर्क झाला आहे तर आणखी दहा जण बेपत्ता असल्याने त्यांच्या परिवारात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सतीश पाटणकर आणि रेखा पाटणकर रा. समता नगर, ठाणे, समीर जोशी आणि अपर्णा जोशी रा. घंटाळी, नौपाडा, ठाणे, सुनील सुभेदार रा. पलावा, डोंबिवली, संजय पाटील आणि नलिनी पाटील रा. कल्याण पश्चिम, रजनीश नातू रा. बाळकुम, ठाणे, यशस भांड रा. वाशी नवी मुंबई, अभिषेक घोणे रा. काळा तलाव, कल्याण, प्रकाश माने आणि प्रतीक्षा माने रा. डोंबिवली अशी पर्यटकांची नावे आहेत.
दोन दिवसांपूर्वी तिबेट येथे झालेल्या भूकंपामुळे नदीला महापूर आल्याने नेपाळ आणि तिबेट या दोन देशांत हाहाकार उडाला होता. भारतातून नेपाळमार्गे शेकडो पर्यटक कैलास मानसरोवर येथे सहलीला गेले होते. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील अनेक जणांचा समावेश आहे. त्यापैकी बारा पर्यटकांचा संपर्क होत नव्हता. यातील समीर जोशी, अपर्णा जोशी, सतीश पाटणकर, रेखा पाटणकर, रजनीश नातू यांच्यासह कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई भागातील पर्यटक रिचा सहल कंपनीच्या माध्यमातून कैलास मानसरोवर येथे मागिल आठवड्यात गेले होते. दोन दिवसांपूर्वी आलेल्या महापुरामध्ये नेपाळ येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. या १२ पर्यटकांचा ठावठिकाणा लागत नव्हता. आज डोंबिवली येथे राहणारे प्रकाश माने आणि त्यांची पत्नी प्रतीक्षा माने यांचा संपर्क झाला असून आणखी दहा पर्यटकांचा मात्र संपर्क झाला नसल्याची माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.
ठाणे जिल्हाधिकारी प्रशासन, केंद्र आणि राज्य सरकारच्या संपर्कात असून या बेपत्ता पर्यटकांचा संपर्क झाल्याबरोबर परिवाराला माहिती दिली जाईल, या पर्यटकांनी परिवाराशी संपर्क साधल्यास त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.